देशातील भ्रमणध्वनी संपर्क क्रमांकांना १० वरून ११ अंकी करण्याच्या शिफारशींचा प्रस्ताव भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय)ने जाहीर केला आहे.
ब्रेनवृत्त, नवी दिल्ली
देशातील वाढत्या चलभाषयंत्रांचा (Mobile Phones) वापरास बघता आता संपर्क क्रमांकांचीच कमी भासू लागली आहे. या समस्येवर तोडगा काढण्याच्या उद्देशाने भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI : Telecom Regulatory Authority of India) सद्याचे वापरात असलेले १० अंकी भ्रमणध्वनी क्रमांक ११ करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्तावानुसार, प्राधिकरणाच्या मते १० ऐवजी 11 अंकी संपर्क क्रमांक वापरला, तर जास्त क्रमांक उपलब्ध होऊ शकतील.
देशात दिवसेंदिवस चलभाषयांत्रांचा वापर वाढू लागला आहे आणि ते आवश्यकही झाले आहे. भारतात हे भ्रमणध्वनी क्रमांक (Mobile Numbers) १० अंकी असतात, पण वापरकर्त्यांची संख्या बघता आता या नव्या क्रमांकाचा तुटवडा जाणवू लागलाय. यासाठी ट्रायने (TRAI) १० अंकी असलेले संपर्क क्रमांक ११ अंकी करण्याचे ठरवले आहे. यासाठी एक प्रस्ताव प्राधिकरणाने जाहीर केला आहे. तसेच, फिक्स लाईनसाठी फोन करताना मोबाईल नंबरच्या आधी शून्य लावण्यात यावा असेही सांगण्यात आले आहे. देशांतर्गत मोबाईल फोनद्वारे संवाद साधण्यासाठी मोबाईल क्रमांकाच्याआधी शून्य लिहून संपर्क करणे आवश्यक आहे.
हेही वाचा : फीचर फोन बाजारात अव्वल स्थानी ‘रिलायन्स जिओ’
सोबतच, डोंगल वापरणाऱ्यांसाठी क्रमांक १३ अंकी असणार असल्याचेही ट्रायने म्हटलं आहे. “१० अंकी मोबाईल क्रमांक ९ ने सुरुवात करून ११ अंकी केले गेले, तर तब्बल १० बिलियन क्रमांकाची क्षमता तयार होईल. सद्याच्या धोरणानुसार ७०% क्रमांक वापरले गेले असून, उर्वरित क्रमांक हे फक्त भारतात ७ बिलियन जोडण्यांनाच पुरतील”, असे ट्रायने प्रस्तावात म्हटले आहे. तसेच, प्राधिकरणाने नवीन ‘राष्ट्रीय क्रमांक योजना’ सुचवली आहे. ही योजना लवकरच ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे.
देशात सध्या 10 आकड्यांच्या 210 कोटी जोडण्या (Connections) उपलब्ध आहेत, जे 7, 8 आणि 9 या अंकांनी सुरु होतात. ट्रायने म्हटल्याप्रमाणे, फिक्स्ड नेटवर्कमधून मोबाइलवर फोन करण्यासाठी शून्य वापरणे अनिवार्य झाल्यानंतर, ‘२’, ‘३’, ‘४’ आणि ‘६’ या स्तरांतील सर्व मोफत उपस्तरांवर (Free Sub-Levels) मोबाईल क्रमांक वापरता येतील.
◆◆◆