Site icon MarathiBrain.in

धोकादायक पत्रीपुल पाडण्याच्या कामाला अखेर सुरुवात

कल्याण दि. २५ सप्टेंबर :
वाहतुकीसाठी धोकादायक जाहीर झालेला नेतीवलीचा पत्रीपूल पाडण्याच्या कामाला आज दुपारपासून सुरवात करण्यात आली. धोकादायक झाल्याने गेल्या महिन्याभरापासून या पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद आहे.

मुंबईतील अंधेरी पूल दुर्घटनेनंतर २० जुलै रोजी पत्री पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं होतं. आयआयटी मुंबई,  कल्याण डोंबिवली महानगर पालिका आणि रेल्वेने केलेल्या ऑडिटमध्ये १०४ वर्ष जुना ब्रिटिश क़ालीन असलेला पत्रीपूल धोकादायक असल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे आधी अवजड वाहतुकीसाठी आणि २२ ऑगस्टपासून सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूल बंद करण्यात आला.

धोकादायक पत्रीपूल

२४ ऑगस्टपासून या पुलाच्या पाडकामाला सुरुवात होणार होती. मात्र मुंब्रा बायपासचं काम पूर्ण झालं नसल्याने शिळफाटा-कल्याण-भिवंडी मार्गावर वाहतुकीचा प्रचंड ताण आला. त्यामुळे मुंब्रा बायपासचं काम पूर्ण होईपर्यंत पत्री पुलाच्या पाडकामाला स्थगिती मिळाली होती.

आता मुंब्रा बायपासचं काम पूर्ण झाल्याने आजपासून पत्री पुलाच्या पाडकामाला सुरुवात झाली. या पुलावर असणारा डांबरी रस्ता जेसीबीच्या सहाय्याने उखडून काढण्यात येत आहे. हा संपूर्ण पूल पाडण्याच्या कामाला सुमारे एक ते दिड महिन्याचा कालावधी लागण्याचा अंदाज आहे.

बातमी प्रतिनिधी – गोपाळ दंडगव्हाळे

twitter: @GopalDandgavale

♦♦♦

तुमचे लिखाण, अभिप्राय आणि सूचना आम्हाला पाठवा writeto@marathibrain.com वर.

Exit mobile version