महायुतीमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात ‘सामाजिक परिवर्तन’ : रामदास आठवले
ब्रेनवृत्त | मुंबई
वंचित बहुजन आघाडी हा समाजातील वंचित घटकांना सत्तेपासून दूर ठेवणारा पक्ष आहे, अशी टीका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीवर आयोजित ‘तोंडी परीक्षा’ या कार्यक्रमात बोलताना आठवले यांनी वंचित बहुजन आघाडी व प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केली आहे.
एबीपी माझाच्या ‘तोंडी परीक्षा’ या कार्यक्रमात, “राज्यात कोणता नेता विरोधकाची भूमिका चांगल्या पद्धतीने निभावू शकतो?” या सवालावर उत्तर देताना रामदास आठवले म्हणाले की, “राज्यात प्रभावी विरोधक नाही. मात्र प्रकाश आंबेडकर हे माझे विरोधक, तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे माझे मित्र आहेत.” सोबतच, समाजातील वंचित घटकांना सत्तेपासून दूर ठेवणारा पक्ष वंचित बहुजन आघाडी असल्याची टीकाही आठवले यांनी यावेळी केली.
महाराष्ट्रातील युतीत हवंय भाजपला मोठा वाटा ?
मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाला नाईलाजाने फक्त ५ जागांवर समाधान मानावे लागत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कार्यक्रमात बोलताना आठवले म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाई) पक्षाला महायुतीत किमान 10 जागा मिळाव्या, यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. परंतु काही तडजोडीनंतर आम्हाला पाच जागांवरच समाधान मानावे लागणार आहे.
युतीत फूट ; एमआयएम लढणार स्वबळावर !
सोबतच, महायुतीमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात सामाजिक परिवर्तन झाले आहे, आणि त्यामुळे आगामी निवडणुकीत महायुती 240 ते 245 जागा जिंकेल अशीही आशा त्यांनी व्यक्त केली आहे.
◆◆◆