गिर अभयारण्यात पाच वर्षात १६१ सिंहांची वाढ
ब्रेनवृत्त, गुजरात
गुजरातमधील गिर अभयारण्यातील आशियायी सिहांची संख्या ६७४ वर पोहचली आहे. अभयारण्यातील सिहांची गणना केल्यानंतर सिहांच्या संख्येत मागील पाच वर्षात २९ टक्क्यांनी वाढ झाल्याची नोंद करण्यात आली. ३० हजार चौरस किलोमीटर संरक्षित जंगल आणि सौराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांच्या कृषी-पशुपालकीय जमिनीवर पसरलेल्या या अभयारण्यात पाच वर्षांपूर्वी, म्हणजेच २०१५ मध्ये गिरमध्ये ५२३ सिंह होते.
वनअधिकाऱ्यांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक स्तरावर सिहांच्या संख्येतील वाढीची शोधप्रक्रिया ‘पूनम अवलोकन’ या नावाने ओळखली जाते. यंदा सिहांची ही जनगणना मे महिन्यातील पौर्णिमेला होणार होती. मात्र कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जून महिन्यातील ५ आणि ६ तारखेला सिंहांची गणना करण्यात आली. यावेळी सिंहांच्या गणनेसाठी तेरा प्रशासकीय प्रभागात तैनात असलेल्या १४०० जवानांच्या माध्यमातून या प्रक्रियेला गती देण्यात आली. दर पाच वर्षांनी होणाऱ्या या जनगणनेत स्वयंसेवी संस्था आणि स्वतंत्र पर्यावरणवाद्यांसह इतर संस्थांचाही समावेश आहे.
राज्यात आढळू लागली ‘दुर्मिळ गिधाडे’ ; संवर्धनाची गरज कायम
● पाच वर्षांत १५१ सिंहांची वाढ
‘पूनम अवलोकन’ या शोधप्रक्रियेत २०१५ मध्ये झालेल्या सिहांच्या जनगणनेत ५२३ एशियायी सिहांची (२७%) नोंद करण्यात आली होती. यांच्या संख्येत २०२० मध्ये वाढ झाली असून, यंदाच्या जणगणनेत ६७४ सिंहाची (२९%) नोंद करण्यात आली आहे. म्हणजेच गेल्या पाच वर्षात १५१ सिंहांची वाढ झाली आहे. त्याचबरोबर, २०१५ मध्ये सिंहांचे अधिवास क्षेत्र २२,००० चौरस किलोमीटर इतके होते. त्यातही वाढ झाली असून, आता ३० हजार चौरस किलोमीटरच्या क्षेत्रात सिंहाचा अधिवास वाढला आहे, असेही वनअधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
त्याचप्रमाणे, या ६७४ सिंहांच्या संख्येत १६० प्रौढ नर सिंह, २६० प्रौढ मादी सिंहिणी, ४५ तरुण सिंह, ४९ मध्यम वयाच्या तरुण सिंहिणी, ३७ छावे आहेत. मात्र अद्यापही २२ सिंहाची ओळख बाकी आहे.
हेही वाचा : भारत वाघांसाठी सर्वात सुरक्षित अधिवास : पंतप्रधान मोदी
दरम्यान, गेल्या काही वर्षांत सिंहाच्या मृत्यूच्या आकडेवारीत वाढ झाली होती. राज्यशासनाच्या आकडेवारीनुसार, जून २०१७ ते मे २०२९ या दोन वर्षाच्या काळात तब्बल २२२ बछड्यांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. तर दरवर्षी सरासरी ९० बछडे मृत्यू पावतात. प्राण्यांना होणाऱ्या इतर आजारांसह विहिरीत पडणे, रेल्वेखाली येणे, विद्युतदाब या कारणांमुळे सिंहांच्या मृत्यू झाले आहेत, असेही अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कळते.