‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’ आता सर्वांसाठीच !

ब्रेनवृत्त, मुंबई

राज्यातील कोरोना विषाणू बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ सर्वांनाच देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने याविषयी एक आदेश जारी केला असून, या निर्णयामुळे कोरोनाबाधित व कोरोनाची लागण नसलेल्या अशा सर्वांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

राज्यातील, त्यातही मुंबईतील ‘कोव्हिड-१९’ रुग्णांची वेगाने वाढणारी संख्या लक्षात घेत बहुतेक शासकीय व पालिका रुग्णालयांचे करोना रुग्णालयात रुपांतर करण्यात येत आहे. तर, अनेक खासगी रुग्णालये बंद आहेत अथवा रुग्णांना उपचारासाठी नाकारले जाते आहे, हे लक्षात घेऊन नवीन आदेश काढण्यात आल्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. आरोग्य विभागाने घेतलेल्या निर्णयाअंतर्गत पालिका भागांतील रुग्णांविषयीही विशेष पाऊल उचलले आहे. राज्यातील शासकीय व पालिका रुग्णालयांचे सध्या ‘कोव्हिड-१९‘ रुग्णालयात रुपांतर केल्याने आता गुडघेबदल शस्त्रक्रिया व अन्य १२० उपचारांसाठीच्या विशेष व्यवस्थेचा लाभ जन आरोग्य योजनेतील खासगी रुग्णालयातही घेता येणार आहे.

राज्यात ‘महात्मा फुले जन आरोग्य योजने’अंतर्गत एकूण ९९६ आजारांवरील उपचाराची सोय असून, पंतप्रधान जीवनदायी योजनेत १२०९ आजारांवर उपचार केले जातात. राज्यातील जवळपास ८५ टक्के लोकसंख्या या योजनेची लाभार्थी आहे. मात्र, आरोग्य विभागाने काल काढलेल्या आदेशानुसार पांढरी शिधापत्रिका धारकांसह राज्यातील प्रत्येक व्यक्तीला आता महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत उपचाराची सुविधा मिळणार आहे.

● ३१ जुलैपर्यंत नव्या योजनेची मुदत 

राज्यात युनायटेड इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येत असून, ३१ जुलैपर्यंत या नव्या योजनेची मुदत निश्चित करण्यात आली आहे. कोरोना रुग्णांसाठी आगामी काळात खाटा कमी पडू नयेत व करोना नसलेल्या रुग्णांनाही व्यवस्थित उपचार मिळावे, यासाठी सर्वच नागरिकांचा समावेश या योजनेत करण्यात आल्याचे महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितले.

शासकीय रुग्णालयांत १२० आजारांवर उपचार घेण्यासाठीचे तयार केलेल्या विशेष पॅकेज योजनेचा लाभ आता या योजनेतील अन्य खाजगी रुग्णालयातही घेता येणार असल्याचे डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितले. दुसरीकडे, “३१ जुलैपर्यंत योजनेची मुदत निश्चित करण्यात आली असली, तरी राज्यातील करोना परिस्थितीचा आढावा घेऊन गरज पडल्यास योजनेला मुदतवाढही दिली जाईल”, असे डॉ. प्रदीप व्यास म्हणाले.

● या आधीही झालेत योजनेसंबंधी असेच निर्णय

दरम्यान, या आधीही २९ मार्च रोजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी १ एप्रिल २०२० पासून महात्मा फुले जनआरोग्य योजनेत कोरोनाचा समावेश करण्यासह १ हजार रुग्णालयांत रुग्णांवर उपचाराची सोय करण्याचा दावा केला होता. तसेच, महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर या योजनेच्या माध्यमातून राज्यातील १००% जनतेला मोफत उपचार देणार निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला होता. तसेच, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील नागरिकांना मोफत व विनारोख (कॅशलेस) विमा संरक्षण देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असल्याचे जाहीर केले आहे.

 

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: